राज्यातील इ.१ ली ते इ. ९ वी व इ. ११ वी च्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास, तसेच शाळांची वेळ व कार्यकाळाबाबत.
राज्यातील सर्वच शाळा दि. १५ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत बंद करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. तथापि, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव राज्याच्या सर्व भागात सारख्या प्रमाणात नसल्याने व राज्यातील ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे, अशा भागातून शाळा सुरु करण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत असल्याने दिनांक २० जानेवारी, २०२२ रोजीच्या परिपत्रकान्वये राज्यातील इ.१ ली ते १२ वी च्या शाळा स्थानिक परिस्थितीचा विचार करुन दि. २४ जानेवारी २०२२ पासून पुन्हा सुरु करण्याचे अधिकार महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिका आयुक्त व राज्यातील इतर भागात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना शाळा सुरु करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले होते.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असून राज्यातील सर्व आस्थापना / कार्यक्रमांवरील कोरोना विषयक निर्बंध टप्प्या-टप्प्याने उठविण्यात आलेले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने आता खालीलप्रमाणे आदेश दिले आहे:
१) सर्वसाधारणपणे दरवर्षी माहे मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरण्यास परवानगी दिली जाते. या शैक्षणिक वर्षात मार्च पासून एप्रिल अखेरपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्याऐवजी इयत्ता १ ली ते ९ वी व इयत्ता ११ वी चे वर्ग असणाऱ्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्यात याव्यात.
२) माहे एप्रिल अखेरपर्यंत शनिवारी पूर्णवेळ शाळा सूरू ठेवाव्यात. तसेच रविवारी ऐच्छिक स्वरूपात शाळा सूरू ठेवता येईल.
३) इयत्ता १ ली ते ९ वी व इयत्ता ११ वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा माहे एप्रिल महिन्यातील ३ ऱ्या आठवड्यात घेण्यात याव्यात व निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात यावा.
४) सकाळच्या सत्रात शाळा घेणे आवश्यक असल्यास अध्यापनाच्या तासिका पूर्णवेळ शाळेप्रमाणे घेण्यात याव्यात.
५) दररोज १०० टक्के विद्यार्थी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात येत आहे.
६) यापूर्वी दिनांक २० जानेवारी, २०२२ रोजीच्या परिपत्रकान्वये महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिका आयुक्त व राज्यातील इतर भागात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना देण्यात आलेले अधिकार अबाधित राहतील.
0 Comments