१५ जूनला राज्यातील सर्व शाळा बंद पण शिक्षण सुरु; 'यांच्या' परवानगीनेच सुरु होणार शाळा
महाराष्ट्र राज्यात कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने १५ जूनपासून राज्यातील कोणतीही शाळा उघडणार नाही. परंतु, त्या दिवसापासून त्यांना शिक्षण देण्यास सुरुवात होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
शाळा सुरू करण्याचा अधिकार
- जिल्हा परिषद
- कोविड-19 ची ग्राम समिती
- शाळा व्यवस्थापन समिती यांना राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली, नंदूरबार, अमरावतीपासून कोकण व मुंबई-पुण्यातील सर्वच विद्यार्थ्यांना १५ जून पासून शिक्षण मिळेल, अशी व्यवस्था तयार करण्यात आली आहे.
ज्या मुलांकडे अथवा त्यांच्या पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत, अशा विद्यार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीने कशाप्रकारे शिक्षण देता येईल याचेही नियोजन झाले आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने पुस्तके पोहोच केली जाणार असून त्यांना स्वयंअध्ययन करावे लागणार आहे.
त्यावेळी त्यांना येणाऱ्या अडचणी ते त्यांच्या शिक्षकांच्या माध्यमातून सोडवतील अशी ही व्यवस्था तयार केल्याचे शिक्षण मंत्री गायकवाड म्हणाल्या. ऑनलाइन शिक्षणाचा विपरीत परिणाम होऊ नये अथवा त्याचा भडिमार होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांच्या वयोमानानुसार चाळीस मिनिटे अथवा एक तासाचे लेक्चर तयार केले जाणार असून प्रत्येक तासाला त्यांना विश्रांती दिली जाणार आहे. या भागांमध्ये अथवा तालुक्यांमध्ये कोरोनाचा काही प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणच्या शाळा दोन-तीन सत्रामध्ये भविष्यात सुरू होतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या...
- विदर्भात 26 जून तर उर्वरित महाराष्ट्रात 15 जूनपासून शिक्षणाला होणार सुरुवात
- मुलांची सुरक्षितता व त्यांच्या आरोग्य पाहून टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जातील शाळा
- 60 टक्के मुलांकडे तथा पालकांकडे आहेत अँड्रॉइड मोबाइल, त्यांना ऑनलाईन तर उर्वरित विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिक्षण देण्याचा प्लॅन तयार
- 15 जूनपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके पोहोचत होतील अशी केली व्यवस्था; पुस्तके आणि ऑनलाईन शिक्षण याचा समन्वय साधून दिले जाणार शिक्षणाचे धडे
- शाळा सुरू करण्यासंदर्भात पालक, केंद्रप्रमुख, शिक्षक, आमदार आणि शाळा व्यवस्थापन समितीसोबत झाली चर्चा
- विद्यार्थ्यांच्या वयोमानानुसार ऑनलाईन शिक्षणाची ठरवली जाणार वेळ; प्रत्येक तासाला दिली जाणार विश्रांती
- विद्यार्थ्यांना मास्क, फिजिकल डिस्टन्स व सॅनिटायझर वापरण्याबद्दल दिले जाणार प्रशिक्षण
- पंधराव्या वित्त आयोगातील निधी राज्य शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी साबण, सॅनिटायझर व मास्क खरेदी केले जाणार
- शिक्षकांचा पगार दरमहा नियमित व्हावा यासाठी वित्त विभागाला दिले पत्र; कोरोनाच्या अनुषंगाने उपाययोजनांसाठीही मागितला निधी
0 Comments