दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रक लांबणीवर व दिवाळीसह अन्य सुट्ट्यांनाही कात्री
लॉकडाऊन वाढल्याने आणि राज्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने, आगामी शैक्षणिक वर्षातील शाळांचे वेळापत्रक कोलमडले आहे. दर आठवड्यात 48 तासांचा अभ्यासक्रम पूर्ण होणार नसल्याने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने अनावश्यक अभ्यासक्रम कमी केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळणार नसल्याने एसएससी बोर्डाने आगामी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करावा, असे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने काढले आहे. तर शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रम पूर्ण व्हावा या हेतूने दिवाळीसह अन्य सुट्ट्या कमी कराव्यात, असेही या परिपत्रकात म्हटले आहे.शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार...
- पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना एक महिना घरातूनच अभ्यास करण्याचा दिला जाणार सल्ला
- विद्यार्थ्यांना सद्यपरिस्थिती पाहता घरी बसून मास्क निर्मितीचे दिले जाणार धडे; शाळा सुरू होण्याच्या आठ दिवस अगोदर विद्यार्थ्यांना सांगितली जाणार तारीख
- कोरोनाच्या संसर्गामुळे शाळांचे तथा शैक्षणिक वर्षाचे नियोजन कोलमडले आहे; आठवड्यात 48 तासांचा अभ्यासक्रम पूर्ण होत नसल्याने एसएससी बोर्डाने परीक्षा वेळापत्रकात होणार बद्दल
- दिवाळीसह अन्य सुट्ट्या कमी कराव्यात; विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे या शैक्षणिक वर्षात अभ्यासासाठी वेळ मिळणार नसल्याने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद करणार आवश्यकतेनुसार अभ्यासक्रम कमी
- एका वर्गात 20 ते 30 विद्यार्थी बसवावेत; एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविण्याचे निर्देश
- शाळा मोकळ्या जागेत भरवावी परिपाठ टाळून वर्गातच होणार नुसती प्रार्थना; परिस्थितीनुसार दोन ते तीन सत्रात भरवली जाणार शाळा
भाषा, गणित, विज्ञान विषयांना राहणार प्राधान्य
कोरोना या विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग प्रत्यक्षात कधी भरतील, हे अद्यापही अनिश्चितच आहे. या पार्श्वभूमीवर आकाशवाणी तथा स्थानिक केबल नेटवर्क चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाईन शिक्षणाचे धडे देण्याचे नियोजन आहे. रेड झोन वगळता ज्या भागांमध्ये मागील 15 दिवसांत एकही कोरोना रुग्ण सापडलेला नाही, अशा भागातील शाळा व्यवस्थापन समिती व ग्राम सुरक्षा दलाच्या अभिप्रायानुसार तेथील शाळा भरविल्या जाणार आहेत. मात्र, सद्यस्थिती पाहता भाषा, विज्ञान व गणित या विषयांना प्राधान्य द्यावे तर उर्वरित विषयांचे विद्यार्थ्यांनी स्वयंअध्ययन करावे, असेही शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
-सकाळ
0 Comments